गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुडगूस; चार वाहने पेटवली

जहाल माओवादी सृजनाक्काला चकमकीत ठार मारल्यामुळे संतापलेल्या नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत बंद पुकारला आहे. या बंद दरम्यान सर्व व्यवहार ठप्प राहावेत म्हणून नक्षलवाद्यांनी चार वाहने पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्षलवाद्यांनी हा धुडगूस घातल्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

काही दिवसांपूर्वीच पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जहाल माओवादी सृजनाक्का मारल्या गेली होती. त्यामुळे नक्षलवादी हादरून गेले होते. या घटनेच्या निषेधार्थ या माओवाद्यांनी २० मे रोजी गडचिरोली बंदची हाक दिली होती. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात बंदचे पोस्टरही लावण्यात आले होते. मात्र, आज बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. पण बंद यशस्वी होण्यासाठी नक्षलवाद्यांनी काल रात्रीपासूनच जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. काल रात्री येथील राष्ट्रीय महामार्गावरील गजामेंढीच्या जवळ त्रिशूल पाँइटवर छत्तीसगडमधून आलेल्या रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रकला नक्षलवाद्यांनी आग लावून दिली. सुदैवाने चालकाने ट्रकमधून पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला. मात्र यात ट्रकचालकाचे ९० लाखांचे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर सावरगाव पोलिसांसह गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पेट्रोलिंग वाढवली. त्यानंतर या राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून धुडगूस घालणाऱ्या नक्षलवाद्यांचाही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, गडचिरोलीतील जनजीवन सुरळीत असून नक्षलवाद्यांच्या बंदचा फारसा परिणाम झाला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *