ऐन थंडीत विदर्भात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस; पिकांचं नुकसान

ऐन हिवाळ्यात विदर्भात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला. पहाटे पासून सुरू झालेल्या या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे किमान तापमानात घट होऊन विदर्भात कडाक्याची थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

विदर्भातील नागपूर, अमरावती, धारणीमध्ये मेघगर्जनेसह गारपीट झाली. तर वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, पुसद, भंडारा आणि यवतमाळलाही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज पहाटे अडीचच्या सुमारास नागरपूर आणि अमरावतीमध्ये पावसाला सुरुवात झाली. मोहपा येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह बोरांच्या आकारा एवढ्या गारा पडल्या. त्यामुळे पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. धारणीत पहाटे ४.४५ वाजता पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धारणीतील वीज पुरवठा बंद करण्यात आला. नागपूरमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडल्याने नागपूरकरांची प्रचंड तारांबळ उडाली. अमरावती जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अमरावतीत मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वाशिम, नांदेड, हिंगोली आणि यवतमाळमध्येही सकाळपासूनच पावसाने थैमान घातले. वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर आज पहाटेपासून परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. अवेळी बरसलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाती आलेले पिक वाया गेले. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे.

अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तर हिंद महासागरात चक्रवाताची बनलेली स्थिती कायम आहे. त्यामुळे हवेतील बाष्प खेचले गेल्याने ढगाळ हवामान झाले असून त्यामुळे विदर्भात पाऊस होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या अवेळी आलेल्या पावसामुळे हवामानात बदल झाल्याने सर्दी, ताप आणि खोकल्यासारखे आजार बळावण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *