पेबच्या किल्ल्यावर दारु-गांजा पार्टी, मुंबईतील ११ तरुणांना शिवभक्तांनी कपडे काढून चोपले

माथेरानमधील पेब किल्ल्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री सुरु असलेली दारु आणि गांजा पार्टी स्थानिक तरुणांनी आणि शिवभक्तांनी उधळून लावल्याची घटना समोर आली आहे. मुंबईमधील काही तरुण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पेब किल्ल्यावर गेले होते. मात्र या तरुणांनी किल्ल्यावर मद्यपान आणि गांजाचे सेवन केले. हे तरुण नशेमध्ये गडावर धांडधिंगा करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी आणि शिवभक्तांनी त्यांना चोप दिला.

मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी मुंबईतील ११ तरुण पेब किल्ल्यावर गेले होते. मात्र किल्ल्यावर जाताना त्यांनी स्वत:बरोबर दारुच्या बाटल्या आणि नशा करण्यासाठी अंमली पदार्थही नेले होते. या तरुणांनी रात्री मद्यपान करुन नशेच्या वस्तूंचे सेवन केले आणि ते किल्ल्यावर गोंधळ घालू लागले. याची माहिती मिळताच शिवभक्तांनी किल्ल्यावर धाव घेतली. नशेत असणाऱ्या या तरुणांना पकडून आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचे काम या शिवभक्तांना करावे लागले. त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना माफी मागायला लावली. अक्षय भोसले, किरण नागडा, राहुल नाहीर, ऋषी शहा, मानस अग्रवाल, मिलिंद राठोड, वैभव बोहरी, दीप ताऱ्या, संजय चांदवाणी, इशांत ठक्कर, ऋषभ शेठ अशी या नशा करणाऱ्या तरुणांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवभक्तांनी या अकरा जाणांना ताब्यात घेऊन त्यांना समज दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि कार्याची गाथा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना ऐतिहासिक महत्व आहे. या गडकिल्ल्यावर पुन्हा अशाप्रकारचे कोणतेही वर्तन होणार नाही अशी कबुली या तरुणांकडून वदवून घेतल्यानंतरच त्यांना सोडण्यात आलं. यानंतर शिवभक्तांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जय घोष करत शिवभक्त गडाखाली उतरले.

अनेकदा अशाप्रकारे गडकिल्ल्यांवर मद्यापान करुन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांच्या बातम्या समोर येतात. मात्र तात्पुरती कारवाई करुन अशी प्रकरणे निकाली काढली जातात. असे प्रकार होऊ नयेत यासाठी काहीतरी नियमावली आणि कायदा करावा अशी मागणी शिवप्रेमी मागील अनेक वर्षांपासून करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *