पालघरच्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट दिसल्याने पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा

पालघर नजीकच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसून आल्याने पोलिसांकडून संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यानंतर काही दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे पलायन केल्याचे सांगितले जात होते. या दहशतवाद्यांना मोहम्मद मिरसा नावाच्या व्यक्तीने आपल्या बोटीत आश्रय दिला होता. ही बोट सध्या पालघर नजीकच्या समुद्रात फिरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आणि तटरक्षक दल सतर्क झाले आहे.

या बोटीवर मोठ्याप्रमाणात अन्न धान्य आणि अन्य वस्तूंचा साठा आहे. यामुळे तटरक्षक दलाने पालघरच्या मच्छीमारांशी शुक्रवारी सकाळीच बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. ही हालचाली दिसल्यास तटरक्षक दल किंवा पोलिसांना लागलीच कळविण्यास सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी केरळच्या किनारपट्टीवर आयसिस या दहशतवादी संघटनेच्या हालचाली वाढल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. केरळमध्ये १५ दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे केरळमध्ये यापूर्वीच हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *