औरंगाबाद जिल्ह्य़ातील ७४९ गावे व २७० वाडय़ांसाठी खासगी व शासकीय टँकरची संख्या १ हजार १३१ पर्यंत गेली आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९५, तर सर्वात कमी १० टँकरद्वारे सोयगाव तालुक्याला पाणीपुरवठा होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
टँकरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सिल्लोड तालुका आहे. सिल्लोडमध्ये १८७ टँकर सुरू आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा होणारी सिल्लोडमधील ९४ गावे ९० वाडय़ा आहेत. वैजापूर तालुका टँकरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. वैजापूरमध्ये १८५ टँकरद्वारे १२५ गावे आणि १७ वाडय़ांना पाणीपुरवठा सुरू आहे. गंगापूर तालुक्यातील १४१ गावे व ४१ वाडय़ांना १७९ टँकरद्वारे पाणी पुरवल्या जात आहे. पैठण आणि फुलंब्री तालक्यात अनुक्रमे १३१ व ११४ टँकर सुरू आहेत. या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे ९६ व ६८ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. कन्नड, खुलताबाद व सोयगाव तालुक्यात अनुक्रमे ८४, ४६ व १० टँकर सुरू आहेत. कन्नडमधील ५१ गावे २९ वाडय़ा, खुलताबादमधील ३१ गावे १५ वाडय़ा तर सोयगावमधील सहा गावे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
नऊ तालुक्यातील ५६१ खासगी विहिरी, विंधन विहिरी, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांसाठी ५० कोटी ११ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान पंचायत समिती स्तरावरील प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहे.