ठाणे: भिवंडीत कंपनीला भीषण आग; लाखोंची हानी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील काल्हेर येथे एका कंपनीला भीषण आग लागली. या आगीत लाखोंची वित्तहानी झाल्याची माहिती आहे. भिवंडी आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, आग आटोक्यात आणण्यात येत आहे.

काल्हेरमधील जय माता दी कम्पाउंडमधील एका कंपनीला आज सकाळी ५.४० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळानं आग पसरली. आग आणि धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत होते. घटनेची माहिती मिळताच, भिवंडी अग्निशमन केंद्र आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन केंद्रातून बंब आणि पाण्याचे टँकर मागवण्यात आले. अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती भिवंडी अग्निशमन केंद्राकडून देण्यात आली. या आगीत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. लाखोंची वित्तहानी झाल्याचं सांगण्यात येत आहे. याआधीही ३१ डिसेंबरला भिवंडीत कापडाच्या एका कारखान्याला भीषण आग लागली होती. त्यात मोठे नुकसान झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *