शहीद हेमंत करकरेंबद्दल साध्वी प्रज्ञा यांचं धक्कादायक वक्तव्य

२६/११च्या मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी अत्यंत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ‘हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवलं होतं. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळं झाला आहे,’ असं खळबळजनक वक्तव्य भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार व मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी केलं आहे. साध्वी यांच्या या वक्तव्यामुळं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भोपाळमधील एका सभेत साध्वी बोलत होत्या. बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या साध्वींना उमेदवारी दिल्यामुळं विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. त्यांच्या उमेदवारीला आव्हानही देण्यात आलं आहे. त्यामुळं साध्वी त्यांच्या प्रचारसभांतून स्वत:वरील आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे करत असतानाच काल साध्वी यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘हेमंत करकरे यांनी मला खूप त्रास दिला. मला शिवीगाळ केली. मला बॉम्बस्फोट कटात गोवले. सुरक्षा आयोगाचा सदस्य असलेल्या एका चौकशी अधिकाऱ्यानं मला सोडण्याचे आदेश त्यांना दिले होते. मात्र, करकरे मला अडकवण्यावर ठाम होते. काहीही करून पुरावे गोळा करेन. पण तुला सोडणार नाही, असं करकरे म्हणाले होते. ‘करकरे हे कुटिलतेनं वागत होते. ते देशद्रोही, धर्मद्रोही होते,’ असं साध्वी म्हणाल्या.

‘करकरेंचा वंशनाश होईल असा शाप मी दिला होता. ज्या दिवशी मी जेलमध्ये गेले, तेव्हा त्यांच्या घरी सुतक सुरू झालं होतं. दहशतवाद्यांनी त्यांना मारल्यानंतर ते सुतक दूर झालं,’ असं धक्कादायक वक्तव्यही साध्वी यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *