रणरणत्या उन्हात, ग्राहक बँकेच्या दारात

जव्हार शहारातील, गांधी चौकातील महाराष्ट्र बॅँकेच्या शाखेमध्ये पुरेशी जागा नसल्याने ग्राहकांना रणरणत्या उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. याबाबत प्रसार माध्यमांनी वृत्त दिल्यानंतर काही दिवसांसाठी शाखेबाहेर मंडप घालण्यात आला होता. मात्र तोही आता काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे बँकेत येणाऱ्या आदिवासी ग्राहकांची कुचंबणा होत आहे.

ग्राहकांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींनंतर बँकेने नव्या जागेचा शोध सुरू केला होता. मात्र, आता तोही थांबण्यात आला आहे. तसेच या समस्येवर पर्यायी उपाय शोधण्यातही बँकेला रस नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आदिवासी ग्राहकांना बँकेची लहान-मोठी कामे करण्यासाठी बँकेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागते.

गांधी चौकात मुख्य रस्ता व गजबजलेल्या भररस्त्याच्या मध्यभागी ग्राहक उभे असतात. या परिसरात वाहनांची सतत वर्दळ असल्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

रणरणते उन्ह आणि घशाला कोरड

सध्या या भागातले तापमान ४२ अंशांच्या आसपास आहे. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसू लागतात. अशातच बँकेच्या बाहेर महिला आणि वृद्ध ग्राहक आपला नंबर येण्याची वाट पाहात उभे असतात. त्यांच्याकडे पाहून तरी बँकेने नव्या जागेची व्यवस्था करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *