चादर गँग पोलिसांच्या जाळ्यात

कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरांत एकाच आठवड्यात मोबाइलच्या तीन मोठ्या शोरूममधून जवळपास एक कोटी रुपयांचे मोबाइल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. भिवंडी आणि उल्हासनगर डीसीपी पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत चादर गँगच्या १० चोरांना वसई येथून अटक करण्यात आली. जप्त मुद्देमालाबाबत पोलिसांनी अद्याप माहिती देण्यास नकार दिला.

गेल्या आठवड्यात कल्याण येथील मोबाइलची दोन दुकाने फोडून ३० लाखांचे मोबाइल चोरी केल्याची घटना घडली होती. उल्हासनगर येथील मोबाइल मार्केटमधील साऊंड ऑफ म्युझिक या मोबाइलच्या शोरूममधूनही चादर गँगने ४६ लाख रुपयांचे मोबाइल पळवले होते. कोणगाव येथेही यश कलेक्शन या इलेक्ट्रोनिक दुकानातून २० लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. एकाच आठवड्यात जिल्ह्यात चार दुकानांत चोरी करत एक कोटीचा मुद्देमाल चादर गँगने चोरी केला होता. भिवंडी आणि उल्हासनगर डीसीपी पथकाकडून विविध माध्यमांतून तपास सुरू करण्यात आला होता. यातच चादर गँग  वसई रेल्वे स्थानक परिसरात एक मोबाइलचे दुकान फोडण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे भिवंडीचे डीसीपी अंकीत गोयल आणि उल्हासनगरचे डीसीपी प्रमोद शेवाळे यांच्या पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत या भागात सापळा रचला आणि दुकान फोडण्यासाठी आलेल्या चादग गँगच्या १० जणांना अटक केली. या टोळीकडून पोलिसांना तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त करायचा असून, हे सर्व आरोपी बिहार राज्यातील असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *