सूर्याच्या तप्ततेचा पृथ्वीला धोका नाही

लवकरच सूर्याच्या तापमानात एक टक्क्याने वाढ होणार असल्याने सजीवसृष्टीचा नियंता असलेल्या सूर्यापासून येत्या काळात आपल्याला धोका आहे, अशी गृहितके आत्तापर्यंत मांडली जात होती. मात्र त्यांना छेद देत आणखी दहा वर्षे तरी सूर्याच्या तापमानात सध्यापेक्षा फारसा फरक पडणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष भारतीय संशोधकांनी काढला आहे.

सौरडागांच्या कालचक्रात आणखी एक दशक फारसा फरक पडणार नाही. या डागांची संख्या सध्या असलेल्या संख्येइतकीच असेल, असा निष्कर्ष कोलकातातील ‘आयसर’ या संस्थेतील प्राध्यापक दिब्येंदू नंदी आणि पुण्यातील ‘आयुका’मधील पीएचडी विद्यार्थी प्रांतिका भौमिक यांनी संशोधनाद्वारे काढला आहे. खगोल विज्ञानातील हे महत्त्वपूर्ण संशोधन मानले जात असून, त्यांचा प्रबंध नुकताच ‘नेचर कम्युनिकेशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. येत्या काळात सौरडागांची संख्या कमी होत जाऊन सूर्याचे तापमान १ टक्क्याने वाढेल, असा अंदाज आत्तापर्यंत वर्तवला जात होता. सूर्याचे तापमान अर्धा टक्क्याने जरी वाढले तरी पृथ्वीवरील तापमानात मोठा फरक पडू शकतो. यामुळे हे धोकादायक होते. मात्र प्रचलित अंदाज पद्धतीला छेद देत नंदी आणि भौमिक यांनी प्रथमच सौरडागांच्या कालचक्रातील हालचालींचा अभ्यास केला. सौरडागांचे २५वे कालचक्र हे २४व्या कालचक्राप्रमाणेच असेल, असे नंदी आणि भौमिक यांच्या अभ्यासातून समोर आले आहे. तसेच त्यातूनच वातावरणातील बदलांचा पुढील १० वर्षांचा आढावा शक्य झाला. यापूर्वीच्या अभ्यासांमुळे चार ते पाच वर्षांचा अभ्यास करणेच शक्य होत होते. (अंतराळाचा वेध…७)

सौरडाग यासाठीच धोकादायक

सौरडागांचे आकारमान पृथ्वीपेक्षा १० पट अधिक व चुंबकीय क्षेत्र पृथ्वीपेक्षा १० हजारपट अधिक सक्षम असते. यामुळे हे डाग दुर्बिणीतून पाहता येतात. हा अभ्यास गॅलिलिओच्या काळापासून सुरू आहे. सध्याच्या सौरडागांचे २४वे कालचक्र संपत आले आहे. या कालचक्रात पृथ्वीच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाले. भविष्यात हे बदल अधिक भयावह असतील, असे भाकित आत्तापर्यंत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *