चार वर्षाच्या मुलासह एका आईनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामाळा तलावात उडी घेऊन तिनं स्वतःसहीत मुलाचंही आयुष्य संपवलं आहे. रुपाली गुज्जेवार आणि अभिर गुज्जेवार,अशी मृतांची नावे आहेत. हे मायलेक चंद्रपूर येथील पीएचनगर बघडखिडकीजवळील रहिवासी होते. रुपाली आणि अभिर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. बुधवारी (21 नोव्हेंबर) दोघांचेही मृतदेहच सापडले. रामाळा तलावात त्यांचे मृतदेह तरंगताना आढळले. यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सीमावादात अडकलेले पोलीस
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडले. तलावातील पाणी रामनगर पोलिसांकडे आहे, तर तलावाची पाळ शहर पोलिसांकडे आहे. त्यामुळं शहर पोलीस रामाळा तलावावर पोहोचले, तरीही मृतदेह काढण्यासाठी रामनगर पोलिसांची प्रतीक्षा करत बसले. बऱ्याच वेळानंतर रामनगर पोलीस तेथे आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. शहर आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या या असंवेदनशीलपणामुळे नागरिक संतप्त झाले आहे.
