फाशीनंतर सहा वर्षांनी जिवंत झाला अजमल कसाब

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा जिवंत झालाय. उत्तर प्रदेशच्या ओरैय्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाब हा ओरैय्या जिल्हा प्रशासनाच्या रेकॉर्डमध्ये अजूनही जिवंत दाखवण्यात आलाय. इतकंच नाही तर त्याला रहिवासी आणि जात प्रमाणपत्रही जारी करण्यात आलाय.

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फाशी देण्यात आली होती. अजमल कसाबच्या दाखल्यांचा घोळ समोर आल्यानंतर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत जिल्हा अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीनंतर संबंधित लेखापाल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय… तसंच कसाबला जारी करण्यात आलेली प्रमाणपत्रंही रद्द करण्यात आली.

चौकशी अधिकारी एसडीएम प्रमेंद्र सिंह बिधूना यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल कसाबच्या नावानं एक रहिवासी प्रमाणपत्र जारी करण्यात आलंय. एखाद्या अज्ञात व्यक्तीनं खोटे दस्तावेज सादर करत ऑनलाईन अर्ज केला होता.

ही गोष्ट लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय सूचना केंद्रानं (एनआयसी) त्याचं रहिवासी प्रमाणपत्र रद्द केलंय. या प्रमाणपत्रात कसाबचं जन्मस्थान बिधूना सांगण्यात आलंय. तर आई-वडिलांच्या नाववर मुमताज बेगम आणि मोहम्मद आमिर या नावांचा उल्लेख आहे.

या घटनेनंतर यूपी सरकारच्या सक्रियतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. उत्तरप्रदेशच्या सरकारी कार्यालयांत काही पैसे देऊन कुणाचाही खोटा दाखल त्वरित मिळवता येऊ शकतो, असा खुलासाही हे प्रकरण उजेडात आल्यानंतर झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *