प्रकाश सावंत यांची नार्को टेस्ट करा; नातेवाईकांची मागणी

दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातील दुर्घटनाग्रस्तांचे नातेवाईक आणि त्यांच्या हितचिंतकांचा आज पहिल्यांदा भडका उडाला. यामध्ये हर्णे-पाज येथील शेकडो कोळी बांधवांनी आपला मोर्चा थेट कुलगुरू भवनात नेत दुर्घटनेत बचावलेले एकमेव अधिकारी प्रकाश सावंत देसाई यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम हेदेखील सहभागी झाले होते. याप्रकरणी नुकताच विद्यापीठस्तरीय चौकशी समितीचा अहवालही सदर करण्यात आला. मात्र, याप्रकरणी झालेल्या सर्वच चौकशांमध्ये सावंत देसाई निर्दोष ठरले आहेत.

आज पाज येथील राम मंदिरात सकाळी दहा वाजता दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईक आणि हितचिंतकांची सभा बोलावण्यात आली होती. येथे चर्चा झाल्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या लोकांनी थेट कुलगुरू भवनावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. कुलगुरू भवनात आल्यानंतर सावंत देसाई यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. यामध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या.

२८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे मिळून ३४ जण बसने दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले होते.

मुख्यमंत्र्यांनाही पाठवले होते पत्र
अपघाताच्या काही दिवसांनी मृतांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. बस कोण चालवत होते, हे समोर येणे गरजेचे आहे, असे या पत्रात म्हटले होते. एकटेच प्रकाश सावंत कसे काय वाचले?, ते नेमके कुठे बसले होते?, ते एकटेच कसे बाहेर फेकले गेले?, शेवाळ लागलेल्या कातळावरुन ते कसे वर आले?, असे प्रश्नही यात विचारण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *