सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मंदिराच्या आवारात जिवंत जाळले

उत्तर प्रदेशमधील संभल येथे ३५ वर्षांच्या महिलेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शनिवारी घडली. बलात्कारानंतर नराधमांनी महिलेला मंदिराच्या आवारात जिवंत जाळले असून पाचही आरोपी हे महिलेचे नातेवाईक आहेत.

संभलमधील राजापूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३५ वर्षांची महिला शनिवारी रात्री तिच्या घरी झोपली होती. तिची सात वर्षांची मुलगी देखील घरातच होती. रात्री दोनच्या सुमारास आरोपी महिलेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेला फरफटत घराबाहेर काढले. यानंतर तिला घरालगतच्या मंदिराच्या आवारात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला जाळून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. मात्र, तिथून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. महिलेचा पती गाझियाबादमध्ये रोजंदारीवर काम करतो.

पाचही नराधम हे महिलेचे नातेवाईकच आहेत. अरम सिंह (वय ३०), महावीर (वय ४५), चरण सिंह (वय २०), गुल्लू (वय २१) आणि भोना उर्फ उमर पाल (वय २२) अशी या आरोपींची नावे आहेत. ‘आरोपींनी महिलेला जाळल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, महिलेवर बलात्कार झाला होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक चाचणीनंतरच हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *