शहरात शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी रेणुका राम काकडे हीने आपल्या घरातच शाळेच्या नविन ड्रेसच्या ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, रेणुका राम काकडे, (वय १६ , रा.विठ्ठल मंदिराजवळ, जामखेड) या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीचा शुक्रवारी, (दि. १५)शाळेचा पहिलाच दिवस होता. मात्र, तिने आपल्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत रेणुका राम काकडे ही इयत्ता नववीत कळंब, जिल्हा उस्मानाबाद, येथे आपल्या मामाच्या गावाला शिकत होती. मात्र, इयत्ता दहावीसाठी ती पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे जामखेड येथे आली होती. शाळेचा दाखलाही कळंब येथील शाळेतच होता. १ जुनपासून ती जामखेड शहरातील कन्या विद्यालयात दहावीच्या नियमित ज्यादा तासाला देखील जात होती. त्यावेळी तीने शाळेत दाखला दिला नसल्याने तिला शिक्षकांनी दाखला घेऊन येण्यासही सांगितले होते. शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस होता तरी ती शाळेत गेली नव्हती. दुपारी दोन नंतर तिने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बापू गव्हाणे करत आहेत.
