पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून भारतीय जवानांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. त्यात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद  झाला असून दोन नागरिक जखमी झाले आहेत.

गुरुवारी रात्रीपासून आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानसोबत सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानने बीएसएफ पोस्ट आणि स्थानिक नागरिकांना लक्ष्य केलं असून त्यांच्यावर मोर्टार डागायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानही जशास तसे उत्तर देत आहेत. दरम्यान, अरनिया येथील नागरिकांना घराच्याबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून अर्नी, बिश्नाह आणि आरएस पुराच्या परिसरात नियंत्रण रेषेपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्यात बीएसएफचे कॉन्स्टेबल सीताराम उपाध्याय शहीद झाले. उपाध्याय हे झारखंड येथील रहिवासी असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

दरम्यान, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केलेला असतानाच बांदीपोराच्या हाजिनमध्ये अतिरेक्यांनीही हल्ला केला आहे. भारतीय जवानांच्या गस्तीपथकावर अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार करून पलायन केले. मात्र सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराची घेराबंदी केली असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *