अॅलर्ट नसतानाही शाळांना सुट्टी

वादळाचा अॅलर्ट असल्याचं निमित्त पुढे करून हरयाणामधील शाळा-महाविद्यालयांना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र हवामान खात्याने हरयाणा सरकारला कोणताही अॅलर्ट दिलाच नसल्याचं उघड झालं असून त्याबाबत स्वत: पंतप्रधान कार्यालयाने हवामान खात्याकडून खुलासा मागितला आहे.

‘वादळाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारला कोणत्या सूचना दिल्या आहेत. त्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला आहे काय?,’ असा सवाल पंतप्रधान कार्यालयाने हवामान खात्याला केला आहे. त्यावर आम्ही हरयाणा सरकारला असा कोणताही अॅलर्ट जारी केला नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. शाळा-महाविद्यालये दोन दिवस बंद ठेवण्याची सूचनाही हरयाणा सरकारला देण्यात आली नसल्याचं हवामान खात्याचे देवेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलंय.

येत्या २४ तासांत दिल्ली-एनसीआरला वादळाचा तडाखा बसण्याचा अॅलर्ट देण्यात आला आहे. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आल्याचं प्रधान यांनी सांगितलं. दरम्यान, कोणताही अॅलर्ट नसताना हरयाणा सरकारने आज आणि उद्या सर्व खासगी आणि सरकारी शाळा-महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. हरयाणात ३५० खासगी आणि ५७५ सरकारी शाळा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *