ठाणे जिल्ह्यात १,३४० कर्जबुडवे

खोटीनाटी कारणे सांगत, चुकीची किंवा फसवी कागदपत्रे जोडून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ३४० जणांनी वेगवेगळ्या बँकांतून तीन हजार ३१६ कोटी ७९ लाख ७४ हजार ९२१ रुपयांचे कर्ज बुडवल्याची माहिती हाती आली आहे. सध्या या कर्जबुडव्यांवर गुप्त पाळत असून ते ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या रडारवर आहेत. कोणत्याही क्षणी त्यांची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.
राष्टÑीयीकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि सहकार क्षेत्रातील सुमारे ५० बँकांनी कर्जे देताना पुरेशी काळजी न घेतल्याने त्यांना हा गंडा घालण्यात आला आहे. केंद्र सरकारने ‘इकॉनॉमिक आॅॅफेन्डर्स बिल २०१८’ ला अनुसरून शनिवारी वटहुकूम जारी केला. त्याद्वारे कर्जबुडव्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे या १,३४० कर्जबुडव्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ज्यांनी आतापर्यंत मुद्दल किंवा व्याजही भरलेले नाही, अशा १,३४० जणांवर कारवाई होणार असल्याच्या वृत्तास नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी दुजोरा दिला. शिवाय, कोणत्याही प्रकारची शहानिशा, खात्री न करता, कागदपत्रांची सत्यता न पडताळता मनमानी पद्धतीने कर्जवाटप करणाºया संबंधित बँकांच्या मॅनेजरवरही कारवाईचे संकेत त्यांनी दिले. यात उद्योगपती, राजकीय नेते, कारखानदार, लघुउद्योजक, विकासक आदींसह टॅक्सी, रिक्षाचालक, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बसेस, मालवाहू टेम्पो, ट्रक यासाठी घेतलेले कर्ज, गृहकर्ज, भागभांडवलदार आदींचा समावेश आहे.

८५० जणांनी केली कर्जफेड
सुरुवातीला २,५०० कर्जबुडवे होते, पण कारवाईचा फास आवळला जाणार असल्याचे लक्षात येताच, त्यातील ८५० जणांनी काही दिवसांत कर्जफेड केली, तर काहींच्या वसुलीचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *