राज्यभरात अनेक ठिकाणी रविवार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ आणि सोलापूरमध्ये वीज पडून सहा जण ठार, तर पाच जण जखमी झाले.
यवतमाळमध्ये दुपारी वादळ, पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने वेणी व वाकोडी शिवारात काही शेतकरी आणि शेतमजूर एका निंबाच्या झाडाखाली थांबले होते. तेथे अचानक वीज कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. साडेतीनच्या सुमारास महागाव तालुक्याच्या वेणी (वाकोडी) शिवारात ही घटना घडली. प्रभू नारायण जाधव (४५), पंडित दिगांबर हरणे (३०), अनिल विष्णू सगरुळे (२५), लक्ष्मण रमेश चोपडे (१८) अशी मृतांची नावे आहेत.
अक्कलकोट शहर व तालुक्याला रविवारी गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. सायं. पाचच्या सुमारास वीज कोसळून चिंचोळी (न.) येथील अलाउद्दीन दसगीर बेनुरे हा शेतकरी ठार झाला. बेनुरे हे शेळ्या चरण्यास घेऊन गेले असता ही दुर्घटना घडली. सायंकाळी सांगोला तालुक्यातील काशिदवाडी येथे वीज पडून बाळासाहेब सावंत (५०) यांचा मृत्यू झाला.
पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज
यवतमाळ आणि नांदेड येथे रविवारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला़ पुढील दोन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज
हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.
