महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. राज्यात नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे भाजपने राज ठाकरे यांच्या मनसेला टाळी दिल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि मनसे युती झाल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत मनसेनेने आपले खाते उघडले. देवरुख नगरपंचायतीमध्ये आता मनसेचा एक नगरसेवक असणार आहे. तसेच भाजपने ही निवडूक जिंकून शिवसेनेला जोरदार धक्का देत पुन्हा ही नगरपंचायत आपल्याकडे राखण्यात यश मिळविलेय. त्यामुळे भाजप-मनसे युतीमुळे मनसेला नगरपंचायतीमध्ये सत्तेत स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजकारणातील नवी समीकरणे
प्रभाग १२ मधून मनसेच्या उमेदवार सान्वी संसारे (मनसे) २२९ यांनी शिवसेनेच्या उमेदवार दीक्षा शेट्ये (१५७) यांचा पराभव केला. या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार दिला नव्हता. तसेच काँग्रेसच्या रिया शेट्ये (२९) आणि अपक्ष सोनिया धामणसकर (१३०) रिंगणात होत्या. भाजप-मनसे युतीमुळे येथे शिवसेनेला जोरदार धक्का देण्यात भाजप यशस्वी झाले. तसेच भाजपला विजय मिळवून देण्यात मनसेचा हातभार लागल्याने राजकारणातील नवी समीकरणे देवरुख नगरपंचायतीमध्ये दिसून आलीत.
