मुरबाड औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक बॅगा तयार करणाऱ्या ओम पॅकेजिंग प्रा.लि. कंपनीला बुधवारी रात्री आग लागली. या आगीत कारखाना पूर्ण जळून खाक झाला. कंपनीच्या फिनिशिंग प्लांटमध्ये आग लागली. यात फिनिशिंग केलेला सगळा माल पूर्णपणे जळाल्याची माहिती देतानाच आगीचे कारण मात्र स्पष्ट न झाल्याचे कंपनीचे मालक भरत यांनी सांगितले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास सहा ते सात तास लागले. मात्र, अजूनही तेथे धुम्मस कायम असून अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी आहे. या आगीत सुमारे ७० लाखांच्या मालासह अन्य वस्तुंची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा अंदाज आहे. नागरिकांची मदत आणि स्थानिक टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. यासाठी मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर येथून अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या.
आग लागल्याचे समजताच तीन खाजगी टँकर आग विझवण्यासाठी धावून गेले. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या, पण आगीचे स्वरूप मोठे असल्याने तहसीलदार सचिन चौधर यांनी कल्याण, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, भिवंडी येथील अग्निशमन दलालादेखील पाचारण केले. आगीच्या सात बंबांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी सहा ते सात तास लागले. त्यानंतर आता तेथे कुलिंगची प्रक्रिया सुरू आहे.
