दहा मिनिटांत होत्याचे नव्हते

जालना जिल्ह्यातील पूर्व भागात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक तुफान वेगाने गारपीट झाली. सभोवतालच्या परिसरात अक्षरशः अंधार पसरला आणि वारे अतिशय वेगाने वाहू लागले. क्षणार्धातच आकाशातून मोठमोठ्या आकाराच्या गारांचा तुफान वेगाने वर्षाव सुरू झाला. साधारणपणे दहा मिनिटात निसर्गाचा हा सगळा खेळ आटोपला आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून गेला.

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, पक्षी मरून पडले. पावसाच्या जोरदार सरी कोसळून गावातील रस्ते जलमय झाले तर रानात गारांच्या पांढऱ्या रंगाच्या चादरी अंथरल्या गेल्या. काही मिनिटांत होत्याचे नव्हते करणाऱ्या या अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वंजार उम्रद येथील वयोवृद्ध शेतकरी नामदेव लक्ष्मण शिंदे (वय ६५) शेतात असताना या भयानक गारपिटीत सापडले. गारांच्या माराने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात साधारणपणे बदनापूर, मंठा, घनसावंगी, जाफ्रराबाद आणि जालना तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. अस्मानी संकटामुळे आंबा, गहू, द्राक्ष, हरभरा अशा पिकांचं नुकसान झाले.

लिंबापासून ते संत्री, क्रिकेटच्या चेंडूच्या आकाराइतक्या गारी पडल्याने शहरात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, घराचे पत्रे उडाले, रिक्षांचे टप फाटले, या गारपिटीमुळे झाडाचा पालाही राहिला नाही. अनेक झाडे उमळून पडली, जागोजागी गारांचे ढिगारे साचले होते, मंठा तालुक्यात तर गारा पडल्याने काश्मीरचे स्वरूप आले होते.

फत्तेपूर परिसरात गारपीट

जळगाव : जळगाव शहरात काही मिनिटांसाठी पावसाचा शिडकावा झाला, तर जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात रविवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे हातातोंडाशी आलेला रब्बीचा हंगाम वाया गेल्याचे चित्र आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू आणि हरभरा, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले नियोजित दौरे बाजूला सारून नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. यात मांडले, खाडवा, तोडापूर परिसरात त्यांनी भेटी दिल्या.

आजही गारपीट?

येत्या ४८ तासांत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.

कृषिमंत्र्यांचे पंचनाम्याचे आदेश

मुंबई: राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने उद्या विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी दिले. कृषिमंत्र्यांनी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनीही पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *