मुलगीच हवी म्हणणाऱ्यांची संख्या वाढतेय

वंशाचा ‘दिवा’ म्हणजे मुलगाच, हा अट्टहासी समज देशवासीयांनी दूर सारल्याची ‘शुभवार्ता’ हाती आली आहे. मुलगीही माणूस म्हणून मुलाइतकीच सक्षम असते, हे वास्तव स्वीकारत, मुलगी हवी म्हणणाऱ्या स्त्री-पुरुषांची देशातील संख्या वाढत आहे, अशी सुखद बाब ‘राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणा’च्या अहवालातून पुढे आली आहे.

या अहवालानुसार देशातील १५ ते ४९ वयोगटातील ७९ टक्के महिला आणि १५ ते ५४ वयोगटातील ७८ टक्के पुरुषांनी आपल्याला किमान एकतरी मुलगी असावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. सामाजिक दबाव, तसेच आर्थिक क्षमतेचा अभाव यामुळे मुलगी नको, असे म्हणणाऱ्यांची आजवरची संख्या मोठी होती. मात्र ते चित्र आता बदलते आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद नको, असे मत मांडणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. मुलींची भ्रूणहत्या रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर सक्षमपणे भरीव काम सातत्याने सुरू आहे. त्याचेच हे फलित असल्याचे हे कार्य करणारी मंडळी अधोरेखित करीत आहेत.

सन २००५-०६ मध्ये ७४ टक्के महिला, तर ६५ टक्के पुरुषांनी आपल्याला मुलगी हवी, असे म्हटले होते. मात्र, तरीही मुलगा हवाच, हा आग्रहही कायम होता. ‘मुलगा वंशाचा दिवा असतो, तो वंशवेल पुढे नेतो,’ असे कारण त्यासाठी पुढे करण्यात येत असे. आता मात्र ही मानसिकता बदलताना दिसते.

हुंडाबळी, पाण्याची समस्या, शेतीचे प्रश्न आदींमुळे ग्रामीण भागातील जगण्याचे अस्तर उसवत असले तरीही शहरी स्त्रियांपेक्षा ग्रामीण भागातील महिलांना मुलगी जन्माला यायला हवी, असे प्रकर्षाने वाटते आहे. शहरातील ७५ टक्के महिलांना मुलगी हवी आहे, तर ग्रामीण भागातील ८५ टक्के महिला या मुलींच्या जन्माला प्राधान्य देतात. ग्रामीण भागातील ८० टक्के, तर शहरातील ७५ टक्के पुरुषांना ‘लेक लाडकी’ हवी आहे. शिक्षणांचा गंध नसलेले ८३ टक्के पुरुषही मुलगी हवीचा आग्रह धरत असल्याचे अहवालातून दिसून येते. तर, शिकल्या सवरलेल्या पुरुषांपैकी ७४ टक्के पुरुषांना मुलगी हवी, असे वाटते आहे.

मुलीचा स्वीकार वाढला

लिंगभावसमानतेच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या महिला मंडळ फेडरेशनच्या मुमताज शेख यांनी मुस्लिम समाजामध्येही आता मुलींचा स्वीकार करण्याचा विचार अधिक प्रकर्षाने होत आहे, याकडे लक्ष वेधत त्याचे स्वागत केले. मात्र त्याचवेळी मुलींचे शिक्षण, स्वावलंबन या मुद्द्यांवरही प्रकर्षाने विचार करण्याची निकड व्यक्त केली. ऊर्जा संस्थेच्या सहाय्यक सचिव उमा टिपणीस यांना हा बदल ‘आश्वासक’ वाटतो. सरकारने विविध प्रकारच्या योजनांना दिलेले प्रोत्साहन, मुलींबद्दल सिनेमा, साहित्य, कलासंस्कृती या सगळ्याच क्षेत्रात जे सकारात्मक विचार मांडण्यात आले त्यामुळे हे शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *