मुलांच्या शाळेसाठी त्याने डोंगर हलवला!

असलेल्या शाळा बंद करून मुलांचं शिक्षण वाऱ्यावर सोडण्याचे उद्योग राज्यात सुरू असताना, ओडिशामध्ये मात्र मुलांच्या शिक्षणाचं ‘वेड’ डोक्यात घेतलेल्या जालंधर नायक यांनी चक्क डोंगर हलवलाय! मुलांच्या शिक्षणाच्या वाटेवर अडथळा ठरणारा गुमसाही गावाजवळचा डोंगर फोडून फुलबनी शहरापर्यंतचा रस्ता त्यांनी एकट्याने तयार केला आहे. बिहारमधील दशरथ मांझी या अवलियानेही असाच एकट्याने २२ वर्षे डोंगर फोडून रस्ता तयार केला होता!

जिल्हा प्रशासनानेही या कामाची दखल घेतली असून आता त्यांना ‘मनरेगा’ योजनेखाली या कष्टांचा मोबदला दिला जाणार आहे. ‘नायक यांच्या कामाबद्दलची निष्ठा आणि त्यांनी त्यांसाठी घेतलेले प्रचंड कष्ट पाहून मी भारावले आहे,’ असे जिल्हाधिकारी वृंदा डी. यांनी सांगितले.

दोन वर्षे सतत कष्ट करून त्यांनी डोंगर फोडून ८ किमी रस्ता तयार केला. आता पुढच्या तीन वर्षांत आणि ७ किमी रस्ता तयार करण्याचं नायक यांनी पक्कं ठरवलं आहे. आदिवासी समाजात जन्माला आलेल्या ४५ वर्षांच्या नायक यांना कधी शाळेचं तोंडही पाहता आलं नाही; म्हणून आपल्या तीन मुलांना कितीही अडथळे आले तरी शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यासाठीच हातात छिन्नी आणि हातोडा घेऊन शाळेची वाट अडवून उभ्या असणाऱ्या पहाडावर घाव घालायला त्यांनी सुरुवात केली. स्थानिक वर्तमानपत्रात त्यांच्या कामाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतलं. कंधमाल उत्सवात त्यांचा गौरव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, गावात शाळा, इतर सुविधा नाहीत म्हणून गावातले लोक आधीच गाव सोडून गेले आहेत. नायक यांनी मात्र चक्क शाळाच गावाजवळ आणली आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *