अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना मदत म्हणून पालकमंत्र्यांनी थाटामाटात कार्यक्रम घेऊन धनादेश वितरित केले. मात्र, हे धनादेश काही केल्या वटतच नाही. शासकीय मदतीचे हे धनादेश तब्बल तीन वेळा बाऊन्स झाले अन् त्याहून नवल म्हणजे बँकेने लाभार्थ्यांवरच दंडही आकारला आहे. त्यामुळे मदत नको पण दंड आवर असे म्हणण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे.
स्थानिक प्रशासनाने १४ डिसेंबर रोजी यवतमाळात कार्यक्रम घेऊन ही शासकीय मदत वितरित केली होती. पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले होते. परंतु, धनादेश मिळाल्यावर खूश झालेले लाभार्थी बँकेत गेल्यावर हादरले. कारण संबंधित खात्यात पुरेसे पैसेच नाही, या कारणाने शासकीय मदतीचा धनादेश अनादरीत झाला.
यवतमाळच्या गौतमनगरात राहणाऱ्या सपना इंगळे यांचे पती दीपक इंगळे यांचे निधन झाले. त्यांनाही याच कार्यक्रमात प्रशासनातर्फे मदत म्हणून २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा हा धनादेश घेऊन सपना इंगळे तीन वेळा स्टेट बँकेत गेल्या. परंतु, तिन्ही वेळा चेक बाऊन्स झाला. पालकमंत्र्यांनी दिलेला आणि तहसीलदारांची स्वाक्षरी असलेला धनादेशही बाऊन्स होतो, हे पाहून गरीब लाभार्थी महिला अचंब्यात पडली. त्यावरही भर म्हणजे, बँकेने चेक देणाऱ्याऐवजी लाभार्थ्यावरच दंड आकारला आहे.
