मोठ्या विश्रातीनंतर पावसाचे पुनरागम, राज्यात चांगला पाऊस

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री मुंबई, ठाणे, कोकण आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे. त्याचवेळी पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरातसह महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. काल दिवसभरात कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी दमदार सरी बरसल्या. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला.

गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या २४ तासांमध्ये रायगड जिल्हयात दमदार हजेरी लावली. जिल्हयातील अलिबाग, नागोठणे, पेण , कर्जत, उरण, खोपोली  याभागात रात्री उशिरा पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नागोठणे शहर आणि परीसरात पूरसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. नागोठणे येथे कोळीवाडा , एस. टी स्टँड परिसरात पाणी शिरल. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झालाय.

नांदेडमध्ये तब्बल २० दिवसानंतर पावसाने दमदार हजेरी लावली.  गुरुवारी रात्री जिल्ह्यात दीड तास मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्ह्यात रिमझीम पाउस सुरु झाला. नंतर रात्री मात्र पावसाचा जोर वाढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *