मुलाच्या कल्याणाआड पती-पत्नीमधील वाद येऊ नयेत

मुलाच्या कल्याणाआड पती-पत्नीचे वाद येऊ नयेत, असे म्हणत, उच्च न्यायालयाने मुलाच्या वडिलांना त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर सही करण्याचे निर्देश दिले. अडीच वर्षांपूर्वी मुलाच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला आणि आईने त्याची शाळा बदलल्याने वडिलांनी अडीबाजी करत, मुलाच्या शाळा सोडल्याच्या दाखवल्यावर सही करण्यास नकार दिला होता. वडील सही देत नसल्याने, मुलाला नवीन शाळेत प्रवेश मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे त्याच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आईने केलेल्या याचिकेनुसार, अडीच वर्षांपूर्वी तिने पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर, ती वाकोल्यातून कांदिवलीला राहायला गेली. मुलाची शाळा सांताक्रुझला आहे. मुलाला कांदिवलीहून सांताक्रुला शाळेत जाण्यासाठी व घरी येण्यासाठी तब्बल चार तासांचा प्रवास करावा लागत असल्याने, त्याला कांदिवलीच्या घरापासून पाचच मिनिटांवर असलेल्या शाळेत प्रवेश घेतला. मात्र, त्याचे वडील जुन्या शाळेत जाऊन मुलाच्या शाळा सोडल्याच्या दाखवल्यावर सही करत नसल्याने, मुलाला नवीन शाळेत जाता येत नाही. त्यावर वडिलांच्या वकिलांनी जुन्या शाळेची सर्व फी भरली असल्याची माहिती न्या. आर. एम. सावंत यांच्या खंडपीठाला दिली.

तुम्ही कोणतेही दान करत नाही : ‘मुलाला जवळपासच्या शाळेत पाठविणेच योग्य आहे. त्याला इतके तास प्रवास करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही (वडील) सही करत नसाल, तर सही कशी करायला लावायची, हे आम्हाला माहीत आहे. . वडिलांनी सही देण्यास का नकार दिला? याचे कारण त्यांनाच माहीत,’ असे न्यायालयाने म्हटले. ‘तुम्ही कोणतेही दान करत नाही. तो तुमचाच मुलगा आहे,’ अशा शब्दांत न्यायालयाने मुलाच्या वडिलांना सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *