रंगत वाढणार, वेंकटेश प्रसादचाही प्रशिक्षकपदासाठी अर्ज

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कोण होणार यावरुन रोज तर्क-वितर्क लढवले जात असून दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. अनेकांनी रवी शास्त्रीच्या हातीच प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात येईल असा दावा केला आहे. मात्र आधीच रंगलेल्या या लढतीत अजून एक खेळाडू सामील झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादनेही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. प्रशिक्षक होण्यासाठी वेंकटेशही इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. वेंकटेश प्रसाद सध्या ज्युनिअर नॅशनलचा मुख्य निवडकर्ता आहे.
अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर या शर्यतीत सामील झालेली रवी शास्त्री आणि वेंकटेश प्रसाद ही दोन नवी नावे आहेत. कर्णधार विराट कोहलीसाबोत झालेल्या वादानंतर अनिल कुंबळेने तडकाफडकी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर प्रशिक्षकपदाची जागा रिकामी झाली असून बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.
वेंकटेश प्रसाद 90 च्या दशकातील भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्वाचा खेळाडू होता. वेंकटेश प्रसाद 33 कसोटी आणि 162 एकदिवसीय सामने खेळला आहे. वेंकटेश प्रसादने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला, तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने अर्ज केला आहे. वेंकटेश प्रसादसमोर रवी शास्त्रींसोबतच विरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, लालचंद राजपूत यांचं आव्हान असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीला जेव्हा संघ कुंबळेवर नाराज आहे, आणि बोर्डाच्या जनरल मॅनेजरने सेहवागला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितलं असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हस्तक्षेप केला आहे. सचिनने रवी शास्त्रीशी चर्चा केल्यानंतर रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला तयार झाले. प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सदस्यानेच थेट शास्त्रींना अर्ज करायला सांगितल्याने शास्त्रींची अनिल कुंबळेंच्या जागी प्रशिक्षकपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने अखेर विराट कोहली – अनिल कुंबळे वादावर भाष्य केलं. हा वाद समजूतदारपणे हाताळला जाण्याची गरज होती असं मत सौरभ गांगुलीने व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे गांगुली क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे. प्रशिक्षकाची नेमणूक करण्याचा अधिकार या समितीकडे आहे. या समितीत सौरभ गांगुलीसोबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणचा समावेश आहे. हा वाद व्यवस्थित हाताळला गेला नसल्याचं सौरभ गांगुलीने सांगितलं आहे.
”विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यामधील वादामध्ये जो कोणी मध्यस्थी करत होता त्याने व्यवस्थित हाताळण्याची गरज होती. समजूतदारपणे हा मुद्दा हाताळण्यात आलेला नाही”, असं सौरभ गांगुली बोलला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *