पावसानं तळकोकणाला झोडपलं, मुंबईतही हजेरी

रखरखत्या उन्हाच्या झळांनंतर सुरू असलेली पावसाची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून मान्सूननं तळकोकणात दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवारपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. सावंतवाडी, वेंगुर्ल्यासह राजापूर, संगमेश्वर, लांजा येथे पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. तर कोकण वासियांसह वरुणराजानं शुक्रवारी सकाळी मुंबईकरांनाही चांगलंच झोडपलं.

मुंबई शहरासह उपनगरांत पावसाच्या सरी बरसल्या. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या पश्चिम उपनरांमध्ये चांगला पाऊस कोसळला. मात्र, पहिल्याच पावसात नेहमीप्रमाणे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यानं चाकरमान्यांना कामावर जाताना अडचणी येत आहेत. दादर, प्रभादेवी, लालबाग, भायखळा येथेही काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे.

पावसाच्या हजेरीमुळे मुंबईकर उन्हाच्या तडाख्यानंतर सुखावले असले तरी सकाळी कामावर जाताना मुंबईकरांचे हाल होत आहेत. पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी भरल्याने वाहतूक मंदावली आहे. परिणामी ट्राफीकच्या समस्येला मुंबईकरांना सामोरं जावं लागत आहे. मुंबईची ‘लाइफ लाईन’ देखील मंदावली आहे. आता पुढच्या ७२ तासांत मान्सून राज्याला सुखावणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *