शेतकरी संपातील पहिली आत्महत्या, कर्जबाजारी तरुण शेतक-यानं संपवली जीवनयात्रा

राज्यव्यापी शेतकरी संपाचा विषय तापलेला असताना एका तरुण शेतक-यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांचा संप या आत्महत्येमुळे अधिक चिघळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या शेतक-यानं आत्महत्या केली आहे, त्यानंही ”महाराष्ट्र बंद”मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.
नवनाथ चांगदेव भालेराव असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव असून ते 30 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे.
येवला लासलगाव रोडवरील पिंपरी फाटा येथे सोमवारी पुकारण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनात नवनाथ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
येवला ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यव्यापी बंदला नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी झालेले दगडफेकीचे प्रकार तर खडक माळेगाव येथे झालेला लाठीमार असे किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. ठिकठिकाणी झालेले रास्तारोको, मुख्यमंत्री आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन,मेणबत्ती मोर्चा आदिंनी हे आंदोलन झाले. यामुळे ग्रामीण भागातील उलाढाल तसेच व्यवहार ठप्प झाले होते. शहरात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला.
किसान क्रांती मोर्चाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. या बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता. सर्वच ठिकाणी सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. मात्र या बंदचे शहार भागामध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. निफाड, कळवण, दिंडोरी,सुरगाणा, मालेगाव, येवला, त्र्यंबकेश्वर, सिन्नर अशा सर्वच तालुक्यांमध्ये आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे रास्तारोको आंदोलन करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे काही तरुण शेतकऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्गावर जळती टायर टाकून रास्तारोको केले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंदोलकांनी एस. टी. बसवर दगडपेक करून काचा फोडल्या.विविध ठिकाणी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसच सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *