बारावी नापास विद्यार्थिनीची आत्महत्या

बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायन येथे उघडकीस आली. दीप्ती दीपक मोरे (१८) असे या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दीप्तीच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिठ्ठीत तिने आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील कांबळे यांनी सांगितले.

मूळची कोल्हापूरची दीप्ती सायनच्या पिसाळ मैदानच्या मागे पंचशील नगर नं २ झोपडपट्टीत रहात होती. दीप्तीचे वडील खासगी काम करून चरितार्थ चालवतात. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. अभ्यासात हुशार असलेल्या दीप्तीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीला ८५ टक्के मिळवले होते. मंगळवारी दीप्तीचे वडील लवकर कामाला गेले होते. निकाल लागल्यानंतर दीप्ती चार विषयांत नापास झाल्याचे कळल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ‘आई-बाबा मला माफ करा, मला माहित नाही, मी कशी नापास झाले’ अशी चिठ्ठी लिहून तिने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *