प्लॅस्टिक हे प्रदूषण आणि अनेक समस्यांचे मूळ आहे. तेव्हा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्लॅस्टिकच्या वापरला आळा बसावा यासाठी नवीन नियम काढला आहे. तेव्हा यापुढे जो कोणी प्लॅस्टिकच्या पिशव्यांची खरेदी किंवा विक्री करताना आढळल्यास त्याच्याकडून शे पाचशे नाही तर तब्बल पाच हजारांचा दंड आकारण्यात येईल असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी पणजीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार त्याचबरोबर नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपलं देश, शहर, गाव परिसर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. पण ते आता आपलं कर्तव्य विसरले आहेत. अशाप्रकारे मोठा दंड आकाराला तर नागरिकांना धडा मिळेल आणि ते आपला परिसर स्वच्छ ठेवतील, असेही त्यांनी सांगितले. पहिल्यांदा पाच हजारांचा दंड आकारण्यात येईल. तीच व्यक्ती जर दुसऱ्यांदा सापडल्यास हा दंड वाढत जाईल असेही त्यांनी सांगितले. जुलै महिन्यापासून हा नवा नियम गोव्यात लागू होईल. त्याचप्रमाणे लवकरच गोव्यातील महामार्ग साफ करण्याची मोहिमही हाती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक महामार्गावर ‘वर्क स्टेशन’ असतील. नागरिकांनी कचरा मार्गमार्गावर न फेकता, तो इथे जमा करावा अशी ही संकल्पना असणार आहे.