शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण…!

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशा काळात एकेवेळचं बाहेर जेवायचं असल्यास किमान 100 रुपये तरी मोजावे लागता. मात्र, हेच जेवण तुम्हाला 1 रुपयात दिले तर…? खरंतर सहसा विश्वास यावर तुमचा बसणार नाही. मात्र, बीडमध्ये एका रुपयात जेवण दिले जाते. मात्र, हे भरपेट स्वस्त जेवण फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे.

भाजी, चपाती, भात, वरण यांसोबत पापड आणि पिण्यासाठी फिल्टरचं पाणी… हे सगळं केवळ एक रुपयात मिळत आहे. शेतीमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर बाजार समितीच्या आवारात थांबावं लागतं. यावेळी शेतकऱ्यांच्या जेवणाचं हाल होतात. यावर उपाय म्हणून माजलगाव बाजार समितीने एक रुपयात जेवण हा उपक्रम राबवला.

माजलगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर ही बाजार समिती आहे. त्यामुळे सकाळी आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी दुपार होतेच. त्यातच जवळ जेवणासाठी कोणतेही हॉटेल नाही म्हणून शेतकऱ्यासाठी एक रुपयात जेवल मिळू लागल्याने स्वस्तात एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला. हे जेवण करण्यासाठी मात्र शेतकऱ्याला मालाची पोचपावती दाखवणं बंधनकारक आहे.

गेल्या सहा वर्षांपासून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्य शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण दिल जातं आहे. बाजार समितीने एका हॉटेल चालकाला एकोणतीस रुपयाप्रमाणे प्रती शेतकऱ्याचं जेवण ठरवून दिले आहे. यात शेतकऱ्याने फक्त एक रुपया द्यायचा, बाकी राहिलेले पैसे बाजार समिती भरते. रोज दीडशे ते दोनशे शेतकरी या ठिकाणी जेवण करत आहेत.

या वर्षी सरकारने तूर खरेदी केंद्र सुरु केले खरे, पण 15-15 दिवस तुरीचे मापच न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजार समितीची आवारातच मुक्कामी राहावे लागले. अशा परस्थितीमध्ये हमीभावाबरोबरच प्रत्येक बाजार समितीने आपल्या शेतकऱ्यासाठी एक रुपयात जेवण हा उपक्रम सुरु केला, तर निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. एरव्ही केवळ बाजारभाव पडल्याने अनेक बाजार समिती ओस पडलेल्या असतात. मात्र, माजलगाव बाजार समिती मात्र याला अपवाद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *