शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा म्हणून सरकारने माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. परंतु, ही योजना अमलात आणणाऱ्या कंत्राटदारांकडून योग्य आहार पुरवला जात नसल्याच्या वारंवार तक्रारी असतात. अनेकवेळा खिचडीमध्ये पाल, किडे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. गुजरातमधील एका शाळेत तर चक्क मृत उंदीर सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेच्या अमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बुधवारी जमला (ता. कालोल, जि. गांधीनगर) गावातील एका प्राथमिक शाळेत मुलांना देणाऱ्या येणाऱ्या जेवणात मृत उंदीर आढळल्याचे सांगण्यात आले. याबाबत सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ज्या शाळेला राज्य सरकारने मॉडेल शाळा ठरवले होते, त्याच शाळेत हा प्रकार घडला आहे.
जमला आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. विद्यार्थ्यांना हे अन्न देण्याच्या तयारीत असतानाच शिक्षकांना त्यामध्ये मृत उंदीर दिसला, अशी माहिती माध्यान्ह आहार योजनेचे आयुक्त आर.जी.त्रिवेदी यांनी सांगितले.