जेवणात रसगुल्ला नाही? चला लग्न मोडा!

आपण कितीही माॅडर्नपणाचा आव आणत असलो तरी जुन्या कल्पना काही आपल्या मनातून जायला तयार नाहीत. कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात मानापमान नाटय रंगतंच. त्यातही लग्न म्हटलं की डोक्याला ताप. कुठल्या कारणामुळे कोणाला राग येईल हे काही सांगता येत नाही. मग नवरा किंवा नवरीच्या काकांच्या मामाच्या भाच्याची योग्य बडदास्त ठेवली नाही म्हणून भांडण होतात. पण उत्तर प्रदेशमध्ये एक रसगुल्ला वाढला नाही म्हणून लग्न मोडल्याची हास्यास्पद घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशच्या उनाऊ जिल्ह्यात हा प्रकार घडला.

झालं असं की २५ वर्षांच्या शिवकुमारचं लग्न जवळच्या गावातल्या एका मुलीशी ठरलं. सगळं काही छान सुरू होतं. नवरदेव त्याच्या कुटुंबासह वाजत गाजत वरात घेऊन वधूच्या घरी आला. वधूच्या घरच्यांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं. त्यांना जेवायला बसायची विनंती केली.

सगळं छान चाललं होतं. पण ही वादळापूर्वीची शांतता ठरली. जेवायला बसल्यावर शिव कुमारच्या भावाला एक रसगुल्ला जास्त हवा होता. त्याच्या ताटात एक रसगुल्ला होता खरा. पण त्याने आणखी एक मागितला. आता रसगुल्ले वाढण्याची जबाबदारी वधूच्या भावाकडे होती आणि त्याला प्रत्येक पाहुण्याला ‘एक म्हणजे एकच’ रसगुल्ला वाढायच्या सूचना होत्या. आता या भावाचं शिक्षण पुण्यात वगैरे झालं होतं का ते माहीत नाही पण त्याने ‘प्रश्न तत्त्वाचा’ करत आणखी एक रसगुल्ला वाढायला नकार दिला.

झालं! या प्रश्नावरून नवऱ्याकडच्या मंडळींचं बिनसलं. ‘आम्हाला रसगुल्ला देत नाही म्हणजे काय’ असा प्रश्न विचारत त्या मंडळींनी वधूच्या त्या भावाला जाम चोपलं. मग वधूंचे नातेवाईकही पुढे आले आणि हलकल्लोळ झाला. त्यातल्या त्यात वधूचे वडील सामोपचाराने सगळं सोडवायचा प्रयत्न करत होते पण त्यांनाही मार पडला. (कोणाकडून ते माहीत नाही).

शेवटी या सगळ्या प्रकाराला कंटाळत नवरीमुलीने लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. आलेली वरात तशीच निघून गेली.

आपल्याकडे साध्या साध्या गोष्टी फार क्लिष्ट केल्या जातात. लग्न म्हणजे त्या दोघा जिवांचं मिलन. त्यात मानापमान यावाच कशाला? आणि एवढ्या साध्या गोष्टीसाठी लग्न मोडलं जाण्याच्या घटना स्मार्ट फोनच्या युगात आपल्याकडे घडाव्यात याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *