रायगड किल्ल्यावरील जवळपास 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनीच ही धक्कादायक माहिती दिली आहे. जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. मात्र त्यांची योग्य काळजी न घेण्यात आल्याने या झाडांचा मृत्यू झाला आहे.
एकीकडे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर केला जात असताना गडावरील या नैसर्गिक संपत्तीकडे मात्र दुर्लक्ष केलं जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य करण्याचं आश्वासन दिलेल्या भाजपा – शिवसेनेच्या सरकारमध्येच किल्ले रायगडावरील 8 हजार 825 हून अधिक औषधी वनस्पती पाण्याअभावी नष्ट झाल्या आहेत.
जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांना पाणी देण्यासाठी मजूर लावण्यात आले होते. मात्र, अपुऱ्या मजुरीअभावी त्यांनी कामाकडे पाठ फिरवली. यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत घेण्यात आली. मात्र, त्यांनीही सहकार्य न केल्यान अखेर 9 हजार झाडांनी माना टाकल्या आहेत.