अवकाळी पावसातील मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. शेतकरी जर मृत व्यक्ती असेल तर दिवंगत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
बुधवारी मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. बीड जिल्ह्यातील पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गेल्यावर्षी चांगल्या पावसाने शेतक-यांना फायदा झाला होता. पण मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. सोलापूरमध्येही पंढरपूरसह मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये पावसासह गारपीटीने झोडपले आहे. यात द्राक्ष बागांसह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.
अकाली पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पंढरपूरमधील गारपीटग्रस्त भागांची पाहणी केली. अवकाळी पावसात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना चार लाखांची मदत केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली आहे. दरम्यान, रब्बी हंगामात शेतात उत्पादित झालेल्या ज्वारी पिकाची काढणी वेगाने सुरू असून गहू पिकाची कापणीही सुरू आहे. तसेच हरभराही काढला जात आहे. परंतू अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. यातच द्राक्ष बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे काढली जात असताना हा अवकाळी पाऊस होऊन वादळी वारेही झाल्यामुळे याचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. या पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांसह द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. काही ठिकाणी पावसासोबत फारसा वारा नसला तरीही आंब्याचा मोहोर गळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
बीडला सर्वाधिक फटका
परळी तालुक्यात कौठळी येथे शेतात गहू काढण्याचे काम करत असताना वीज पडून आश्रुबा गायकवाड आणि सुशीला कुंभार या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. केज तालुक्यातील येवताजवळ सावंतवाडी रस्त्यालगत शेतात वीज पडल्याने ओंकार सटवा निर्मळ (वय १२) हा ठार झाला असून नितीन आश्रुबा धिगाणे हे जखमी झाले आहेत. दरडवाडी येथे भागवत रावसाहेब दराडे (वय ४०) व आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे सीमा गोरख कारंडे यांचा वीज पडून मृत्यू झाला. वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जनावरे दगावली आहेत.