जवानांना तक्रारी पाठविण्यासाठी भारतीय सैन्याचा व्हॉटसअॅप ग्रुप

काही दिवसांपूर्वी सैन्यातील आणि निमलष्करी दलातील जवानांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर आता भारतीय लष्कराकडून अशाप्रकारच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रूपच्या माध्यमातून भारतीय जवान त्यांच्या तक्रारी थेट लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यापर्यंत पोहचवू शकणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तेजबहादूर यादव या जवानाने सीमेवरील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार थेट समाजमाध्यमांवर मांडली होती. त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे सैन्यदलाची प्रतिमा काहीप्रमाणात मलिन झाली होती. दरम्यान, तेजबहादूर यादव या जवानाची त्याचे सहकारी दबक्या आवाजात प्रशंसा करत आहेत. किमान कोणीतरी बोलण्याचे धाडस दाखवले आणि या गंभीर विषयाला अखेर वाचा फुटली, असाच त्यांचा सूर होता. या सगळ्याची दखल घेत आता भारतीय लष्कराने जवानांना तक्रारी पाठविण्यासाठी व्हॉटसअॅप ग्रूप तयार केला आहे. +९१-९६४३३००००८ या क्रमांकावर जवानांना त्यांच्या तक्रारी पाठवता येतील.

सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते सध्या जवानांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी असलेली व्यवस्था तत्पर आहे. मात्र, याठिकाणी तक्रार करूनही एखाद्या जवानाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसेल तर तो आता या व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून थेट लष्करप्रमुखांकडे तक्रार करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी या ग्रूपच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण, या ग्रुपवर येणारे संदेश , छायाचित्रे आणि व्हिडिओंवर कोणतेही नियंत्रण ठेवता येणे शक्य नाही. हा व्हॉटसअॅप ग्रुप सुरू झाल्यापासून आतापर्यंत १३ लाख जवानांनी या ग्रूपवर संदेश पाठवले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निमलष्करी दलांच्या जवानांनी समाजमाध्यमांवर माहिती प्रसिद्ध करण्यावर केंद्रीय गृह खात्याने नियंत्रण आणले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, मात्र तसे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही, अशा आशयाचे संदेश गृह खात्याचा हवाला देऊन काही वेळाने ट्विटरवरून प्रसिद्ध झाले होते. याशिवाय, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी लष्करी जवानांवर अशी काही बंधने घातली असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता. सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांनी त्यांच्या सेवेसंबंधी तक्रारी थेट समाजमाध्यमांवर मांडल्याने मोठी खळबळ उडाली. लष्करप्रमुख रावत यांनी जवानांना तक्रार निवारणासाठी प्रथम अंतर्गत व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *