शाळकरी मुलाचे अपहरण करून अमानुष मारहाण

नेहमीप्रमाणे शाळेस जाणाऱ्या चापोली (ता. चाकूर) येथील एका दहावीच्या वर्गातील १६ वर्षीय मुलाचे शुक्रवारी सकाळी अपहरण करून त्यास जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान, तो बेशुद्ध पडल्याचे पाहून अपहरणकर्त्यांनी घरणीजवळील पुलानजीक फेकून दिले. सुदैवाने तिथून जाणाऱ्या शेतकऱ्यास मुलगा जखमी अवस्थेत पडल्याचे पाहिल्याने त्याच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अजय सुरेश मल्लिशे (१६, रा. चापोली, ता. चाकूर) असे या मुलाचे नाव आहे. चापोली येथील अजय मल्लिशे हा गावातीलच संजीवनी विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे तो शुक्रवारी सकाळी शाळेला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून घराबाहेर पडला. दरम्यान, तो शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला असता अज्ञात व्यक्तींची त्याचे चारचाकी वाहनातून अपहरण केले.

वाहनात त्याच्या डोक्यास, पोटाला आणि पायाला जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी त्यास घरणीनजीकच्या पुलाजवळ फेकून दिले आणि अपहरणकर्ते पसार झाले. या रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका शेतकऱ्यास मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्याने ही माहिती नागरिकांना दिली़ त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. पुंडलिक चाटे, पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार, युवासेना जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण पेटकर, शिवसेना तालुका प्रमुख अंगद पवार, चाँद मोमीन, शेखर पाटील, सुरेश भालेराव यांनी घरणीकडे धाव घेऊन त्याला उपचारासाठी लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *