इंग्लंडची अवस्था बिकट, ४ बाद 80

भारताचा पहिला डाव ४५५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या इंग्लंडची अवस्था ४ बाद ८० अशी बिकट झाली आहे.
कर्णधार अॅलिस्टर कुक अवघ्या (२) धावांवर शामीच्या एक अप्रतिम चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. त्यानंतर इंग्लंडचे अर्धशतक पूर्ण होताच हमीद (१३) धावबाद झाला.  तर त्याच्यापाठोपाठ डकेट ५ धावांवर बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था ३ बाद ७३ अशी झाली आहे. त्यानंतर जो रूटने अर्धशतक झळकावले खरे पण तो ५८ धावांवर खेळत असताना अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाल्याने इंग्लंडला चौथा धक्का बसला. सध्या अली (१) व स्टोक्स (१) खेळत आहेत. नव्या चेंडूने इंग्लंडला आणखी काही धक्के मिळाल्यास इंग्लंडचा डाव अडचणीत येऊ शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत भारताचा पहिला डाव ४५५ धावांत संपुष्टात आला आहे. कर्णधार कोहली (१६७) बाद झाल्यानंतर भारताचा गडगडलेला डाव अश्विनने (५८) सावरण्याचा  प्रयत्न केला, मात्र अखेर भारताचे सर्व गडी ४५५ धावांमध्ये  बाद झाले. मोहम्मद शामी ६ धावांवर नाबाद राहिला.
४ बाद ३१७ वरुन भारताने दुस-या दिवसाचा खेळ सुरू केला. मात्र थोड्याच वेळात कर्णधार कोहली १६७ धावांवर बाद झाला व त्यानंतर संघाचा डाव छेपाळला. कोहलीपाठोपाठ वृद्धीमान सहा ३ तर जडेजा भोपळाही न फोडता (०) बाद झाल्याने भारताला लागोपाठ दोन धक्के बसले. १०७ षटकांत ७ गडी गमावत भारताने ३६६ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर आर. अश्विनने यादवच्या सहाय्याने भारताचा ढेपाळलेला डाव सावरत ४००चा टप्पा पार करून दिला. उपहारापर्यंत भारताने ११९ षटकांत एकूण ४१५ धावा केल्या आहेत. अर्धशतक करून (५८) अश्विनही तंबूत परतला व त्यानंतर एकूण ४५५ धावांत भारताचे सर्व गडी बाद झाले.
इंग्लंडतर्फे अँडरसन आणि अलीने प्रत्येकी ३ तर ब्रॉड, स्टोक्स आणि रशीदने १-१ बळी टिपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *