पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्याने देशात निर्माण झालेला गोंधळ पाहता देशातील राष्ट्रीय महामार्गावरील ११ नोव्हेंबपर्यंत टोलमाफी देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्याने व्यवहार करताना सामान्य माणसाला अडचणी येत आहेत. त्यामुळे रस्ते व महामार्ग खात्याने सर्वच राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांवर ११ नोव्हेंबपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे गडकरी यांनी ट्विटरवरून जाहीर केले.
देशातील टोलनाक्यांवर निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राघव चंद्रा यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिली. याबाबतच्या अधिकृत सूचना सर्वच टोल कंपन्यांना जारी केल्या आहेत.
पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्याने टोलनाक्यावर या नोटा बाळगणाऱ्या कार चालकांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यात दोन दिवस टोलमाफी राज्यात ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी देण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांसोबत सर्वच टोलनाक्यावर टोलमाफी दिली जाईल.