घातक वायू प्रदूषणाने दिल्लीकरांची झोप उडालेली आहे. या घातक प्रदूषणाला तेल कंपन्या जबाबदार आहेत. या तेल कंपन्यांनी पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे, अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली.
मुंबई पोर्ट ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, तेल कंपन्यांकडे प्रचंड पैसा आहे. हेच प्रदूषणाचे मोठे कारण आहे. देशात प्रदूषण वाढवण्यास याच कंपन्यांचा मोठा सहभाग आहे.
आता या तेल कंपन्यांनी देशातील पर्यावरण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यमुना नदीजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारत आहे. आता या कंपन्यांनी आपली दुकाने बंद करून जैव-इंधनाकडे वळावे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रदूषण ही देशातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. देशातील वाढत्या वाहन संख्येबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. देशातील कार उत्पादक कंपन्यांना युरो-६चे निकषाचे पालन करावे लागणार आहे. यासाठी सरकारने एप्रिल २०२०ची अंतिम मुदत दिली आहे. यात कोणताही बदल केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील प्रदूषणाचा हवाला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना करताना ते म्हणाले की, सध्या दिल्लीतील प्रदूषणाबाबत वर्तमानपत्रांत अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मुंबईत पाणी व हवा प्रदूषणाची समस्या आहे. मुख्यमंत्री व राज्य सरकारने देशाच्या आर्थिक राजधानीचे संरक्षण करावे. विशेषकरून या शहरातील हवा व पाण्याचे प्रदूषण रोखावे, अशी सूचना त्यांनी केली.
गडकरी म्हणाले की, मी अनेक वर्षे मुंबईत राहिलो आहे. मात्र, वरळी सीफेसवर दरुगधीमुळे जावेसे वाटत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्वच्छ इंधन म्हणून माझ्या खात्याने द्रवरूप नैसर्गिक वायूला (एलएनजी) प्राधान्य दिले आहे. या इंधनावर चालणाऱ्या कॅटमरानचे तंत्रज्ञान रशियाकडून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही कॅटमरान एका तासात ३७ नॉटिकल मैल प्रवास करते, अशी माहिती त्यांनी दिली.