बिहारमधील छठपूजेला अपघातांच्या घटनांनी गालबोट लागले आहे. छठपूजेदरम्यान दोन विविध घटनांमध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरभंगा येथे छठपूजेवरुन परतणा-या सहा महिलांचा ट्रेनखाली सापडून मृत्यू झाला. तर मुझफ्फरपूर येथे पाच मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
देशभरात आज छठपूजेचा पर्व साजरा होत असला तरी बिहारमध्ये छठपूजेच्या पर्वावर शोककळा पसरली. पहिल्या घटनेत दरभंगा जिल्ह्यातील रामभद्रपूर स्थानकाजवळ छठपूजेवरुन परतणा-या सहा महिलांचा ट्रेनखाली सापडून अंत झाला. या सर्व महिला सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करुन घरी परतत होत्या. रेल्वे रुळ ओलांडत असताना स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस या ट्रेनखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी खळबळ माजली. जवळच्याच गावातील मंडळींनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. मात्र यादरम्यान महिलांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर स्थानिकांमध्ये असंतोष खदखदत असून संतप्त ग्रामस्थांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन आंदोलनाचा प्रयत्नही केला. या अपघातासाठी रेल्वे जबाबदार असून रेल्वेने भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी आहे. दरभंगा येथील घटना ताजी असतानाच मुझफ्फरपूर येथे पाच मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशभरात आज छठपूजेचा पर्व साजरा होत असून मुंबईतील चौपाट्यांवरही उत्साहात छठपूजेचा पर्व साजरा कऱण्यात आला.यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.