पाकिस्तान जाणुनबुजून करतंय स्थानिकांवर गोळीबार, 500 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिंकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तान बदला घेण्याच्या उद्देशाने आणि आपली आपली कातडी वाचवण्यासाठी वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. शस्त्रसंधी उल्लंघन करताना पाकिस्तान जाणुनबुजून सीमारेषेवरील ग्रामस्थांवर फायरिंग करत असल्याचं सरकारी अधिका-यांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानने बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सैन्यांना भारतीय बीएसएफ जवान, लष्कर यांच्यासोबत स्थानिकांनाही टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत. फक्त गेल्या पाच आठवड्यात पाकिस्तानने 500 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यावरुन पाकिस्तानच्या डोक्यात काय कट शिजत आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
यावर्षी फक्त एकट्या जम्मूमध्ये 200 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यामधील सर्वात जास्त शस्त्रसंधी उल्लंघन सर्जिंकल स्ट्राईकनंतर करण्यात आलं आहे. 2015 मध्ये पाकिस्तानने एकूण 405 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केलं होतं.
पाकिस्तानी दहशतवादी आणि रेंजर्स सीमारेषा पार करुन भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी पाकिस्तानकडून कव्हर फायरिंग केली जात आहे. मात्र बीएसएफने चोख प्रत्युत्तर देत त्यांचा डाव अनेक वेळा उधळला आहे. याचा परिणाम आता पाकिस्तानात दिसू लागला आहे. दरम्यान पाकिस्तानकडून होणा-या फायरिंगमुळे अनेक लोक स्थलांतरित झाले असून नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील 100 हून अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
दिवाळीच्या दोन दिवस अगोदरही पाकिस्तान लष्कर आणि रेंजर्सने जम्मूमधील अखनूर सेक्टरमध्ये फायरिंग करत भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता. बीएसएफने पाकिस्तानला इतकं चोख उत्तर दिलं होतं की त्यांनी हार पत्करत सफेद झेंडे दाखवून फायरिंग थांबवण्याची विनंती केली. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी जवान ठार झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *