अभिषेक नायरच्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईने तामिळनाडूवर दोन विकेट्स राखून सनसनाटी विजय मिळवला.
हरयाणातल्या लाहलीत झालेल्या या सामन्यात तामिळनाडूने मुंबईला विजयासाठी अवघ्या 97 धावांचं आव्हान दिलं होतं. पण अश्विन क्रिस्ट आणि विघ्नेश यांच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईची सात बाद 60 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत अभिषेक नायरने एकाकी झुंज देऊन मुंबईला विजय मिळवून दिला.
अभिषेक नायरनं 56 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावांची खेळी केली. बलविंदरसिंग संधूने बहुमोल 12 धावांची खेळी केली. नायर आणि संधूनं आठव्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी रचली.
तामिळनाडूसाठी विघ्नेश आणि अश्विन क्रिस्टने प्रत्येकी 4 फलंदाजांना माघारी धाडलं.
त्याआधी धवल कुलकर्णीच्या भेदक माऱ्यासमोर तामिळनाडूचा दुसरा डाव 185 धावांत आटोपला होता. धवलने 47 धावांत तामिळनाडूच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं. तामिळनाडूचा पहिल्या डावात अवघ्या 87 धावांत खुर्दा उडवला होता. त्यानंतर मुंबईने पहिल्या डावात 176 धावांची मजल मारुन 89 धावांची आघाडी घेतली होती.