मोदी सरकार जवानांच्या रक्ताची दलाली करतंय असा घणाघाती आरोप करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.“जवानांच्या रक्ताची दलाली असा शब्द वापरणं म्हणजे या देशाचा आणि जवानांचा अपमान आहे. जवानांचं रक्त अनमोल आहे. त्याचं मूल्य करु शकत नाही. दलाली हा शब्द काँग्रेसच्या नसानसात भिनला आहे. त्यामुळे दलाली सारखा शब्द उच्चारुन राहुल गांधींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत”, असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला.
बोफोर्सपासून ते अगुस्तापर्यंत, कोळशापासून ते २ जी घोटाळ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत दलाली, त्यामुळे ‘दलाली’ शब्दाशी काँग्रेसचं विशिष्ट नातं आहे, असा घणाघात अमित शाहांनी केला.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वात आधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. त्यामुळे ते पाकिस्तानमध्ये लोकप्रिय झाले. मग केजरीवालांना भारतीय जवानांवर विश्वास नाही का, असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला.भारतीय सैन्याच्या कामगिरीवर काही राजकीय पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. शहीद जवानांचा, भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या पक्षांची मी निंदा करतो. सर्जिकल स्ट्राईकबाबत राजकारण करणं चुकीचं आहे, असं अमित शाह म्हणाले.