पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या रक्ताची दलाली करतात असा सनसनाटी आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. काश्मिरमध्ये भारतीय जवानांनी प्राणांची आहुती दिली. पाकव्याप्त काश्मिरात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. जवान आपलं रक्त सांडून देशाची रक्षा करीत असताना नरेंद्र मोदी राजकारणात मश्गुल असल्याची टीका राहुल गांधींनी केलीये.
देवरिया ते दिल्ली या यात्रेच्या जंतर-मंतरवर सांगता झाली. यावेळी राहुल गांधींनी मोदी सरकावर सडकून टीका केली. साखर कारखाने बंद होत आहे. आपले तरुण रोजगाराचे स्वप्न पाहात आहे. पण हे सरकार त्यांना आश्वासनाशिवाय दुसरे काहीही देत नाहीये. मोदींनी सबका साथ सबका विकासची घोषणा करत तरुणांना नोकया देण्याचं आश्वासनं दिलं होतं पण आता ते हवेतच विरलं आहे अशी टीका राहुल गांधींनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात दरी निर्माण करत आहे. सीमेवर आपल्या जवानांनी प्राणांची आहुती दिली. पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला पण, मोदींनी जवानांच्या रक्ताची दलाली केली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. विशेष म्हणजे, कालच मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईक बनावट असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन काँग्रेसचीच मोठी कोंडी झालीये. त्यात आता राहुल गांधींच्या टीकास्त्रामुळे वादात भर पडण्याची शक्यता आहे.