गुजरातमध्ये दोन दिवसांपूर्वीच एक संशयित नाव आढळल्यानंतर, तिकडे पंजाबमध्ये अशीच नाव मिळाली आहे. पंजाबमधील अजनाला सेक्टरमध्ये रावी नदीत ही संशयित नाव उभी होती. ती नाव बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतली असून, त्याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.ही नाव कोणाची, त्याचा मालक कोण, याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न बीएसएफकडून केला जात आहे.बेवारस नाव मिळाली त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच पूल कोसळला होता. मात्र तो पूल दुरुस्त करुन तीन दिवस उलटले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच गुजरातच्या पोरबंदरजवळ भारतीय तटरक्षक दलाने एक संशयास्पद बोट पकडली होती. या बोटमधील 9 जणांना ताब्यातही घेतलं होतं.भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर किनाऱ्यालगतची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुजरातमधील पोरबंदर किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र पावक’ या जहाजावरील जवानांना संशयास्पद बोट भटकताना आढळली. सुरक्षेचा उपाय म्हणून या बोटीतील सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं.