सार्कवर बहिष्कार घालण्याच्या भारताच्या निर्णयाचा अभिमान वाटतो – रतन टाटा

उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे उद्योगपती रतन टाटा यांनी कौतुक केले आहे. भारताने सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याची जी ठोस भूमिका घेतली आणि अन्य सदस्य देशांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल भारताचा अभिमान वाटतो असे टि्वट रतन टाटा यांनी केले आहे.
रतन टाटा यांच्या या टि्वटला ८ हजार लाईक्स मिळाले असून, जवळपास ५ हजारवेळा रिटि्वट करण्यात आले.  उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या छुप्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. त्यानंतर दोन्ही देशात जबरदस्त तणाव असून, पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी देशभरातून होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या भूमिकेला अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान या देशांनी पाठिंबा दिला. त्यामुळे पाकिस्तानात होणारी सार्क परिषद आता रद्द झाल्यात जमा असून, फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. नोव्हेंबर महिन्यात ही सार्क परिषद होणार होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *