ना पाठिंबा, ना विरोध

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी दलित प्रतिमोर्चाबाबतची आपली भूमिका मवाळ केली आहे. मराठा समाजाच्या मोर्चाना प्रत्युत्तर म्हणून काढल्या जाणाऱ्या दलित समाजाच्या प्रतिमोर्चाना आपला पाठिंबा नाही आणि विरोधही करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सूचनेच्या पाश्र्वभूमीवर आठवले यांच्या भूमिकेत बदल झाला आहे.

‘दलित अत्याचार प्रतिबंधक कायदय़ाला (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) विरोध करण्यासाठी जर मराठा समाज मोर्चे काढत असेल तर त्या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याचा दलितांना अधिकार आहे, एवढीच माझी भूमिका आहे. त्यातही अस्वस्थ कार्यकर्त्यांची इच्छा अधिक असल्याने मी समर्थनाची भूमिका घेतली. पण त्यामागे मराठा व दलितांमध्ये तणाव वाढविण्याचा माझा हेतू नव्हता. याउलट मराठा आरक्षणाला मी सर्वात अगोदर पाठिंबा दिला होता. प्रतिमोर्चे काढण्यासाठी प्रोत्साहन देणार नाही आणि कुणी काढत असेल तर त्यांना रोखणारही नाही. ज्याचे त्याने ठरवावे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या मोर्चामधून ‘अ‍ॅट्रॉसिटी’ला विरोध होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर दलितांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून प्रतिमोर्चे काढण्याचे घाटत होते आणि त्यास आठवलेंनी पाठिंबा दिला. याउलट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी प्रतिमोर्चे न काढण्याचे आवाहन केले. त्यातून आठवले, आंबेडकर यांच्यामध्ये जुंपली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *